तानाजीराव मालुसरे पोवाडा

स्वातंत्र्यसंगरीं अर्पुनि शिरकमलाला, स्वातंत्र्यदेविच्या पदीं लीन जो झाला,
तो धन्य धन्य ! नरवीर कीर्तियुत होई, ईश्वर त्यावरि संतोषला ॥ध्रु०॥

चौक १
एके दिवशीं जिजाई पहाटेला । बोलत शिवाजीला ।
“कोंडाणा जंवा दिधला । यवनाला घाला तंवा पडला ।
राज्याला मोंगल काळ झाला । चित्ताचा धीर सकळ सुटला ॥
सारा मुलुख ताब्यांत ठेवण्याला । किल्ला पाहिजे झाला ।
स्वाधीन; आपणाला । ना तरी सदा काळिमा लागला ।
राज्याला तसाच कीर्तीला ॥ पाहिजे विचार हा केला ॥
रामकृष्ण तुमचे पूर्वज । जनक धर्मराज ।
धरावी त्यांची लाज । रावणाला धाक ज्यांचा पडला ।
कंसाला धाक ज्यांचा पडला; । पृथ्वीचा भार कमी हो केला ॥
ज्यांनीं धर्म सकळ बुडविला, । देश चिरडिला, ।
त्यांच्या नाशाला । घेतसे देव नविन अवतार; ।
दुष्टांचा पूर्ण करित संहार; । लक्षांत घ्यावा तोचि व्यवहार ॥
चाल
हें राज्यपद बहु कठीण पृथ्वीवरी ॥ ती भोगलालसा सदा जगीं वावरी ॥
षड्‌विकार होती बहु प्रबळ अंतरीं ॥ मग शुद्धबुद्ध होईल कावरीबावरी ॥
मग दृष्टि राहिल सदैव पापावरी” ॥ ऐकून आईचे बोल ।
शिवराज चित्तिं व्याकुळ, । म्हणे “माय । काय आम्हि केलं ? ।
कधिं पाप नाहीं बघितलं, । धर्मास नाहीं सोडलं ।
गर्वास उभं कापलं । आळसास नाहीं पद दिलं ।
मन तुमच्या अर्ध्या वचनांत सदा राहिलं” ॥
मग जिजामाउलिनं पुन्हां त्यास सांगितलं, ॥
“जर किल्ला घेण्या ऊशिर । शिवराया ! लागला फार ।
तर हिंदुधर्माचं शिर । तर महाराष्ट्राचं शिर ।
मोंगल उडवि सरसर । धर्माचा होइल चूर । पापाचा वाहिल पूर” ।
डोळ्यांत अश्रु सांठले कंठ दाटला ॥ गहिंवरल्या कंठामधून शब्द उमटला ॥
“माघाच्या वद्य नवमीला । तो किल्ला पाहिजे सर झाला ।
करि पूर्ण आस ही बाळा ” । शिवराज बोलले नमून मातृपदाला ॥
चाल
“जर पूर्व-पुण्याई केली । असेल लाभली ।
होइल शिव वाली । माउली । आज निश्च्य केला ।
माघाच्या वद्य नवमीला । जोडिन किल्ला मराठेशाहीला” ॥१॥

चौक २
उमराठं गांव छानदार । सुरेख घरदार ।
लावली तलवार । कमरेला, धाक यमाला पडला ।
पाताळीं काळ जाउन दडला । सौख्याला सदा मोहोर आला ॥
जसा जयंत शोभत इंद्राला । अभिमन्यु अर्जुनाला ।
स्कंद शंभूला । रायबा तसा तानाजीला ।
रायबा तसाच जनतेला । सौख्याला सदा बहर भरला ॥
शेलारमामा सांगत तानाजीला । “रायबा थोर झाला ।
आला हो लगिनाला । कराव औंदा लगिन ह्याचं ।
पाहुंद्या लगिन नातवाचं । चार इसावर हो वय आमुचं” ॥
तानाजिनं होकार तंवा दिला । सोयरा बघितला ।
मुहुर्त मग ठरला । माघाच्या वद्य नवमीचा ।
थाट लइ झाला तय्यारीचा । वर्णील कुठवर ही वाचा ॥
चाल
तंवा सम्द लोक जमुनशान बोलती तान्यास ॥
“लइ तान्या मोठा झालास शिवबाचा दास ॥
त्येचं थोरपण नावरुप सांगशि आम्हांस ॥
त्या शिवरायाच्या पायीं वाहिलं जीवास ॥
घरदार सोडून दिलं त्याच्या कार्यास ॥
त्यास आम्ही कधीं पाहावं ? । त्यास आपण कधीं देखावं ?

डोळ्याचं पारणं फेडावं ? । ’हा ताना शिवरायाच्या मर्जीतला’ ॥
असं कौतुकानं सदानीदा सांगशि आम्हांला ॥
या वेळेस त्यास आणवावं । त्येनं आमचं गांव पहावं ।
त्येनं आपलं राहाणं देखावं । हें असं ध्येनांत धरावं ।
जा शेलारमामा ! तुम्ही तुम्ही त्यास आणावं” ॥
चाल
तानाजिनं इचार जरा केला । मामास सांगितला ।
रायबा संग घेतला । तिघेहि झाले घोडयावर स्वार ।
बाळ तरुण म्हातारपणाचा अवतार । जाहला जगांत जयजयकार ॥२॥चौक ३
ऐका तंवाच राजगडावर । झालेला प्रकार ।
युद्धास घनघोर । आलं हो मूळ, प्रसंग थोर ।
ऐकावं शांत होऊन सारं । चित्ताचा सोडुं नव्हे धीर ॥
’युगत करुन शिवाजी सुटुन गेला । दिल्लीहून आला ।
मराठया प्रांताला । होईल राग त्याचा अनिवार ।
करिल गट्ट मोंगल सरकार । दक्षिणेंत होईल मराठा कारभार’ ॥
औरंगजेबानं विचार असा करुन । पन्नास हजार देऊन ।
शिपाई शिस्त करुन । धाडिला उदयभान सरदार ।
कोंडाणा किल्ल्याचा सम्दा अधिकार । शाहानं दिला तयास बहुकाळ —-॥
असा कागद घेऊन हेजिब आला । जयसिंगानं धाडियेला ।
त्याच समयाला । रायाच्या चैन मनाला पडेना ।
तान्ह्याच्या राया करित स्मरणा । नव्हते कां दुसरे सरदार नाना ? ॥
चाल
हा विचार करिती शिवबा किल्ल्यावरी ॥ तों तानाजी पोंचले राजगडावरी ॥
ती अक्षत देण्या झाली त्यांची तय्यारी ॥ ती जिजामाउली त्यांची इचारपुस करी ॥
हें जाणून ताना चपापला अंतरीं ॥ हें असें कसं आज झालं ।
शिवरायानं नाहिं देखिलं । त्येच्या मनांत काय हो आलं ।
तें अजून नाहिं समजलं । लगिनास आलों आम्ही त्याला बोलावायला ॥
परि येत्या वेळेला सकून सुभ नाहिं झाला ॥ तर त्यास जाऊन भेटावं ।
त्येचं मन सम्द वोळखावं । शिवबानं सदा म्होरं यावं ।
आधि कडकडून भेटावं । मग आमचा हात धरुन किल्ल्यावर न्यावं ॥
परि असं कसं आज व्हावं । याचं कारण त्याला पूसावं ।
मग मामा ! लगिनामंदि एकमन व्हावं’ ॥मग तडक तिघे निघाले । सरासर गेले ।
जेथे शिव बसले । युद्धाचा करित सकळ विचार ।
देशाचा होते करित संसार । आयास म्हणुन पडतोय फार ॥३॥

चौक ४
पाहुन तान्याला शिवाजि पुढं झाला । हातानं धरियेला ।
आणुन बसवीला । विचारी क्षेम तानाजीरावाला ।
मामाला आणिक रायबाला । येण्याचं तसं कारण त्याला ॥
चिंतेच्या अधीन पुरा । रायाचा चेहरा । तानाजीस दिसला ।
बोलला शूर मराठा सरदार । धैर्याचा मूर्तिमंत अवतार ।
प्राणाचा नाहिं तयास दरकार ॥ “तुमचं कुशल आधीं ऐकावं ।
मनानं आनंदावं । नंतर परिसावं । आमुचं; हाच उचित व्यवहार ।
राच्याचा दिला देवानं अधिकार । सांगावा आपला कुशल समाचार ॥
जसं प्रसन्न तुम्हां पाहिलं । पूर्वी मन धालं ।
नाहीं तसं देखिलं । भेटिच्या आजच्या समयाला ।
चंद्राला राहू चिंतेचा लागला । चित्तान असा कयास केला” ॥
शिवराज छत्रपति बोले । “विशेष नाहीं झालं ।
विचार सारं चुकलं । आपुलं, असे कुशळ आमचं ।
आतांच तानाजीराव येण्याचं । सांगावं काय कारण तुमचं ” ॥
चालमालुसरे लागले बोलण्याला, आनंद जरा झाला,
तांदुळ पुढं केला, चित्ताचा हो बाग; परि गेला ।
घटकेंत वाळुनी सारा ! ॥ “शेलारमामानं सांगितलं आम्हांला,
रायबा थोर झाला, आला हो लगिनाला, सोयरा बघितला,
मुहूर्त मग ठरला, माघाच्या वद्य नवमीला ॥
सारे लोक बोलले आम्हांला, ’ऐशा समयाला,
शिवबा पाहिजे आला, आमच्या गांवाला भेट देण्याला,
होईल तोष डोळ्याला’ ॥ सारीं कामं ठेवून बाजूला,
जिजाईमाईला, घेऊन गांवाला यावं लगिनाला,
तोष, दासाला । होईन, धन्य भूपाला” ।
खळबळे प्रेम चित्तांत, आनंद मिळत दुःखांत ॥
शिवराज बोलले तान्यास, ॥ “आमचं मन धांवे येण्यास, ॥
चाल
पर शरीर दुसर्‍या कामावर । झालं तय्यार ।
घेऊन समशेर । कोंडाणा किल्ला कराया सर ।
माउलिनं घातली शपथ घोर । पुरवावी हीच आशा थोर” ॥४॥

चौक ५

’माघाच्या वद्य नवमीला । किल्ला पाहिजे झाला ।
आपला जन्माला ! ना तरी गनिम खास बसला ।
काळिमा लागेल कीर्तीला । जन्मुन काय उपयोग केला’ ॥
अशि शपथ घातली माउलिनं । प्राणहि अर्पुन ।
करिन स्वाधीन । कोंडाणा, जावें तुम्ही परतून ।
रायबाचं लग्न टाकावं उरकून । थाटानं यावं नंतर परतून ॥
या वेळेस स्वारिवर जावं । स्वताच अनुभवावं ।
युद्ध करावं । आशा ही झाली आम्हां अनिवार ।
हातांत घेतलि भवानी तलवार । आम्हां श्रीअंबाबाई आधार” ॥
हे शब्द हृदयिं झोंबले । मर्मिं लागले । ताना मग बोले ।
संचरे आर्यतेज हृदयांत । संचरे क्षात्रतेज अंगांत ।
उपमा नाहीं तिनहि लोकांत ! ॥ “आधीं लग्न लाविन कोंडाण्याचं ।
नंतर रायबाचं । हेंच ब्रिद आमुचं । वाहिला देह त्याच कार्यास ।
युद्ध मोक्षाचं दार आम्हांस ! । आपलं साह्य दीन दासास ॥
चाल
जरि आमच्यासारखं पडतिल लोक रणावर ॥ महाराज !
तरी मिळतील रोज भाराभर ॥ रंगेल लाल रक्तानं त्यांची समशेर ॥
आपण जर जाल बिनिवर । बरंवाईट झालं तर ।
मिळतील काय अवतार । दिसतात सूर्य कां फार ।
दिसतात तारे भरपूर । आमच्यासारख लोक घरोघर ।
तुमच्यासारख येक होणार । राहो लोभ तुमचा आम्हांवर ।
करो दया आज शंकर । सोडा हुकूम जाण्या रणावर ।
माघाच्या वद्य नवमीला किल्ला हो सर ॥
झालाच असं समजावं तरिच हा वीर ॥
ना तरी अंबेच्या पायीं वाहिन शीर !” ॥
चाल
अशि प्रतिज्ञा करुन निघाला । सुचेना अन्य त्याला ।
गात कवनाला । बंधुनो ! ऐका चरित्र त्याचं ।
शूराचं प्रतापि पुरुषाचं । पावन होईल मन आमुचं ! ॥५॥

चौक ६

लगिनाचा बेत रद्द केला ॥ घेऊन सूर्याजिला ।
टेहळणी करण्याला । चालला वेश करुन न्यारा ।
वळविलं रायाजी नाईकाला । ऐकावं त्येच्या पोवाडयाला ॥
घेरेसरनाईक रायाजी । मोठा रणगाजी । म्हणतो परी ’हां जी !’ ।
यवनाला, मोह मनाला पडला । मोंगलाचा दीन चाकुर बनला ।
मर्दाचा सम्दा इचार चुकला ॥ त्येच्या मुलीच्या लग्नामंदि गेला ।
तान्हा गोंधळाला । गात कीर्तीला । शिवबाच्या, झाला सारा लोक गार ।
चित्ताला त्यांच्या त्यानं केला वार । हातांत ओढली त्यांनीं तलवार ॥
रायाजी नाईक बोलला । तंवाच गोंधळ्याला । जाणलं त्येनं त्याला ।

ज्याची हो खूण त्याला कळणार । चित्ताचा झाला त्याच्या निर्धार ।
यवनाचा आला त्यास तिटकार ॥
चाल
“अक्षि रावजी ! तानू गोंधळ्याला ।
वळखिलं सम्दं ! तुम्हाला ! गोंधळ्याचा पोशाख केला ।अन् माझं मन पाहण्याला आला व्हय ? । केल आज पुनित देहाला
दयेचा समिंदर झाला । काय हुकूम सांगावा मला ।
लइ दिसानं योग हा आला । आज जीव आमचा वाहिला शिवबादादाला ॥
देवलोक सम्द खाली आलं वाटतं आम्हाला ॥ राखाया गोरगरिबाला ।
राखाया गाय माउलीला । राखाया आपल्या धर्माला ।
धन्य धन्य तोड गावना तुमच्या कीर्तीला ! ॥”
तानाजी लागला बोलण्यला । “दावावा बुरुज आम्हाला ।
पाहुं द्या तट आम्हांला । रोखुं द्या जागा आम्हांला ।
जिथ्‌नं चढुनशान गांठावं उदयभानाला” ॥
चाल
घेरेसर रायाजि नाइकाला । घेऊन संगातीला ।
रोखुन बुरुजाला । परतले तानेराव सरदार ।
भवानी साह्य ज्यास करणार । वर्णन त्याचं कसं हो सरणार ॥६॥चौक ७
तीन इसा मावळं संगातीला । घेऊन जाण्याला ।
सांगुनशान भावाला । चालला ताना कोंडाण्याला ।
पूजिलं शंभुभवानीला । घेतलं तीस आपल्या मदतीला ! ॥
निघतांना सांज लइ झाली । दौड परि केली ।
गांठली जाळी । राच्चं नौधाव्या घटकेला ।
काळोख सर्वामंदि भरला । घुबडांनीं गोंधळ लइ केला ॥
झुंजार बुरुज गांठला । येशीच्या शेंपटीला ।
लावुन सोलाला । बोलला तान्हा घोरपडीला ।
चित्ताला त्याच्या घोर पडला । पडलेला दूर तिनं हो केला ॥
’यशवंती ! सदा यश दिलस । म्हणुन ठेवलं ।
नांव तुझं भलं । देइ ग आज बी तेंच मजला ।
पुरविन तुझ्या कौतुकाला । घालिन खायला ग्वाड तुजला !’ ॥
असं म्हणुन सोडलं वर तिला । गेली सरसरा । आला पर फेरा ।
दैवाचा, बाई खालतं फिरली । पहिल्यांदा तिनं ही कच खाल्ली ।
असली ती गोष्ट कधिं न झाली ! ॥
चाल
मग तान्हा बोलला रागानं येशवंतिला ॥
“आज इचार काय ग तूं हा केलास ?
असा कधिं नाहीं बघितला । अपशकुन आज मला झाला ।
पर आमचा देह कधिं मागं नाहीं परतला ॥
आणि एकदां सोडतो वर तुला । ततं चिकाट धरुन धीराला ।
नाहिंतर उडविल तलवार तुझ्या ग मुंडक्याला” ॥
घोरपड धांवली सरसरा । वर बसली पाहुनी थारा ।
मग तान्हा झाला सामोरा । त्यानं घट्ट धरलं सोलाला ।
हिस्का मारुन् पाहिलं दोराला । सरसर चढाया लागला ।
जीवाची फिकीर नाहिं त्याला । ’चला या हो’ बोलला लोकाला ।
झरझरा मावळा चालला ! वर भगवा झेंडा चालला ! ।
झट्‌कनं तान्हा झुंजार-बुरजावर गेला ! ॥
अक्षि वायसा सुद्धां गलबला । मावळ्यांनी बघावा नाहीं केला ।
तत मांसारक्ताचा काला । मावळ्यांनीं बघावा लई केला ।
असा धुमाकूळ माजला । तंवा कळल त्येंच्या लोकाला ।
खडबडून जागा मग झाला । मोंगलभाई बोलला ।
सैतान किल्ल्यावर आला’ । ’या कोणि राखा आम्हाला ’ ।
चाल
आतां कोण कसला येणार । तुजला राखणार ।
ताना घेणार । नरडिचा घोट होउनि लाल ।
केल्या पापाच फळ भोगाल । आला या मर्तभूमिवर काळ ॥७॥

चौक ८

अशी कत्तल करुनि सरसरा । सांठवुनि शिरा ।
करुन मलमाला । आईच्या तान्हा लावि हृदयास ।
आला हो आला पूर शौर्यास । देखिलं त्यानं उदयभानास ॥
“हरहर महादेव” बोला । आला ऊत भला ।
खोर्‍यामदिं भरला । भानाला तान्हा सिंहापर खास ।
थरथरे काळ पाहुनी ज्यास । धांवला तो पारतंत्र्य चिरण्यास ॥
उदयभान वीर खळवळे । लाल झाले डोळे । तान्हा मग बोले ।
भानुला, देहभान नुरे त्यास । धर्माचा लागे त्याच्या मनीं ध्यास ।
भानुच्या उदयिं गुंतली आस ॥
चाल
“तूं उदयभान सरदार । रजपूत जातिचा वीर ।
तू हिंदुधर्मा आधार । तू हिंददेशा आधार ।
रामकृष्ण तुमचे पूर्वज होते नरवीर ॥
गायिवासरं पाळुनी कृष्ण झाला लइ थोर ॥
आज शिवानं घेतला अवतार । त्यास यश खास येणार ।
तू मातिमोल होणार । घरची बाईल ओढुन नेती ।
टकटका बघाया लावती । चरचरा गाय कांपिती ।
घटघटा रगात पिती । आमचं देव समदं फोडिती ।
धर्मास दुष्ट तुडविती । तोंडांत मांस घालती ।
साधुसंता त्रास लई देती । बायकाच्या अंगा झोंबती ।
त्यांची करणी सांगावी किती ? । अभिमान गेला शौर्याची झाली बघ माती ! ॥
चाल
तूं शूर मर्द सरकार । धर्मा आधार ।
जातिशीं वैर । साधुनी जाशि घोर नर्कांत ।
येउं दे आंर्यतेज अंगांत । होईल कीर्ती तिनही लोकांत ॥८॥

चौक ९

उपदेश गेला परि वाया । सत्तेची माया ।
सूडाची छाया । पसरली उदयभानावर खास ।
मोगलाचा धरला त्यानं विश्वास । जोरानं धांवला वार करण्यास ॥
तानाजी सिंह खवळला । धावुन गेला ।
पट्टा लइ फिरला । युद्धाला आला रंग अनिवार ।
बिजलिची करणी करित तलवार । दोघेही होते मोठे लढणार ॥
दैवाची करणी परि न्यारी । फिरला माघारी ।
देव कंसारी । भानानं केला तान्यावर वार ।
डाव्या हाताला रक्ताची धार । लागली; पडली भूमिवर ढाल ॥
गुंडाळून हाताला मुंडासा । झाला कसाबसा ।
सज्ज, परि फांसा । दैवानं घातला, कोण काढणार ? ।
दैवाला दया न कधिं येणार । भाळीं जें लिवलं तसंच घडणार ! ॥
तो धैर्यमेरु उमळला । धरणीला आला ।
झाला जीव गोळा । सोडुन देह गेला स्वर्गास ।
भानानं हाणली लाथ डोक्यास; । पापाची भरली त्याच्या घडी खास ॥
चाल
इतक्यांत टोळी घेऊन सूर्या वर आला ॥ त्येनं पाहिलं पळत्या लोकाला ।
त्येनं पाहिलं पळत्या मावळ्याला । “कुठं जाता ?” बोलला तो त्याला ।
सूर्याला मावळा बोलला । ’अहो ताना पडला धरणीला मोठा घात झाला’ ।
डोळ्यांत अश्रु दाटला । पर मोठा धीराचा तो पडला ।
तलवार रोंखुन बोलला पळत्या लोकांला ॥ “अर भित्र्या लोकांनो ?
जरा । ईचार मनामंदी करा ! । अर लढुनशान तरि मरा ।
इथनं पळुनशान जाऊन अमर काय झाला ? ॥
जो भ्याड पळपुटा झाला । तो खास गेला नर्काला ।
ठेवावं खालतं भाल्याला । नेसावं चोळीलुगडयाला ।
कमरेच्या सोडून शेल्याला । नेसावं बायकी शालुला ।
डोक्याला लावुन कुंकवाला । हातात भरुन बांगडीला ।
मग पळुनशान जाऊन राखा जीवाला ॥ काय आल्या धरुन दोराला ।
जाणार सांगाव मला ? । तो दोर तुमच्या आधींच झुंजुन मेला ! ॥
लइ जपुनशान जीवाला । कायमचं काय राहिला ।
इथनं जाउन्‌शान गांवाला । सांगाल काय राजाला ? ।
हर हर महादेव’ बोला । चला घुसूनशान् उडवुया लाख मुंडक्याला” ॥
चाल
धन्य ! धन्य ! सूर्याजीराव ! उतराई व्हावं ।
कशानं सांगावं । भावाचं दुःख लोटुनी पार ।
देण्याला जीव झाला तय्यार । घेऊन याल कधीं हो अवतार ! ॥९॥

चौक १०

पुन्हां सारा उलटला भाला । मावळा एक झाला ।
केला मग हल्ला । मोंगलाची झाली तारपिट फार ।
पळती हो खाल्ला त्यांनीं लइ मार । घेण्याला लावली त्यांना माघार ॥
मामाची झुंज लागली । भानाशीं भली ।घालुन खालीं । भानुला धाडलं घोर नर्कांत ।
फडफडे भगवा झेंडा किल्ल्यांत । प्रसिद्ध झाला तिनहि लोकांत ॥
वृत्तांत सारा घडलेला । कळला राजाला ।
लागली डोळ्यांला । पाण्याची धार, गेला आधार ।
शिवबाला तान्हा प्राणापर प्यार । दुःखाचा झाला त्यास लइ भार ॥
हुंदक्यानं आला उमाळा, । शिवबा बोलला ।
हाय ! घात झाला । ठेवुन पृथ्वीवरती आम्हांस ।
सोडुन गेला । तान्हा स्वर्गास ! । दैवाला नाहिं दया लव खास ॥
चाल
स्वातंत्र्यदेविच्या गळ्यामधुन मणि गळला ॥
काय एकदांच सद्भाग्यचंद्र मावळला ॥
तो देशभक्तिचा सिंधु कोरडा पडला ! ॥
माणीक एक हरपला ! । स्वातंत्र्यहंस तो मेला ।
ताब्यांत आला गड परी सिंह तो गेला ! ॥
पांडुरंग शाहीर गातो त्याच्या कवनाला ॥१०॥

 – शाहीर पां.द.खाडिलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा